मुंबई: राज्यातील महायुती सरकार निधी वाटपात पक्षपातीपणा करत असून अर्थसंकल्पातील निधी केवळ सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातच दिला जात असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. “सबका साथ, सबका विकास” ही घोषणा फक्त घोषणेतच राहिली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे, मात्र विरोधी पक्षातील आमदारांना निधी मिळत नाही. यामुळे राज्यातील अनेक भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटदारांची सुमारे ६२ हजार कोटी रुपयांची थकबाकी असून ६ एप्रिलपासून काम बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे २५० कोटी रुपयांचा QR कोड घोटाळा झाल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला जाब विचारला. कोणतीही कामे न करता QR कोडच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी विकास विभागाच्या निधीबाबतही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. विभागाच्या सोशल सिक्युरिटी वेलफेअरसाठी असलेल्या ४३४९ कोटी रुपयांपैकी तब्बल ३४१६ कोटी रुपये ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुविधा हिरावल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजकीय सूडबुद्धीतून शैक्षणिक संस्थांवर कारवाई होत असल्याचा आरोप करत त्यांनी फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकादमी प्रकरणाचा उल्लेख केला. अशा कारवायांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून राज्यात लोकशाही आहे की हुकूमशाही, असा सवाल त्यांनी केला.
याशिवाय, वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. नागपूर येथे १००० कोटी खर्चून नवीन विधानभवन उभारण्याच्या निर्णयावरून सरकारला वेगळा विदर्भ करायचा नाही, असा आरोप त्यांनी केला. तसेच सिमेंट उद्योगातील कामगारांची कमी मजुरी आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातील निकृष्ट कामांवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली.