मुंबई: नीट (NEET) पेपर लिक प्रकरणी राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. भाजप सरकारच्या काळात गुन्हेगारांना अभय मिळत असल्याने पेपर लिक माफिया मोकाट सुटले असून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
सपकाळ म्हणाले की, ३ मे रोजी देशभर पार पडलेल्या NEET परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची वेळ आली आहे. वर्षभर मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा मानसिक धक्का असून, फेरपरीक्षेमुळे सुमारे २२ लाख विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांचा चुराडा झाला असल्याची टीका त्यांनी केली.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा NEET परीक्षेत गोंधळ झाल्याचा आरोप करत सपकाळ म्हणाले की, २०२४ मधील पेपरफुटीप्रकरणी सुरुवातीला सरकारने आरोप फेटाळले होते, मात्र नंतर बिहार आणि हजारीबाग येथे गैरप्रकार झाल्याचे मान्य करण्यात आले. दोषींवर कारवाईचे आश्वासन देऊनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही.
भाजपा सरकारवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, काँग्रेस किंवा इतर पक्षांचे सरकार असताना भाजपा मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असे, मात्र २०१४ नंतर कितीही गंभीर घटना घडल्या तरी भाजपाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचे दिसत नाही.
महाराष्ट्रातील पेपरफुटीच्या घटनांचाही उल्लेख करत सपकाळ यांनी राज्य सरकारवर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही अनेक पेपरफुटीच्या घटना घडल्या, मात्र त्यावर कठोर कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला. तसेच २ मे २०२६ रोजी झालेल्या एसआरपीएफ दौंड शिपाई भरती परीक्षेतील १०० पैकी ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातून जशास तसे विचारण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी हा देखील स्पर्धा परीक्षेतील गंभीर गैरप्रकार असल्याचे म्हटले.
“भाजपा सरकारला परीक्षा देखील व्यवस्थित घेता येत नाहीत, हे त्यांच्या अकार्यक्षमतेचे लक्षण आहे. देशभरातील विद्यार्थी आणि पालक या कुचकामी सरकारला माफ करणार नाहीत. काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.