मुंबई: माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा करूनच करण्यात आला असून, यामुळे महायुतीत कोणताही वाद निर्माण झालेला नाही, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनी केले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री सामंत म्हणाले की, महायुतीतील सर्व मित्र पक्षांनी युती धर्माचे पालन करावे, यावर सामंजस्य आहे. एखादा पदाधिकारी पक्ष सोडत असेल तर तो महायुतीतच राहावा, ही आमची जबाबदारी आहे. आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांना स्वगृही परतण्याचे आवाहन केले होते.
मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन परांजपे यांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे सामंत यांनी सांगितले. “परांजपे यांचा डीएनए शिवसेनेचाच असल्याने ते स्वगृही परतले,” असेही त्यांनी नमूद केले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या निराधार असल्याचे सांगताना सामंत म्हणाले की, पक्षप्रवेशापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे सचिव जय पवार यांच्याशी चर्चा करून त्यांना संपूर्ण कल्पना देण्यात आली होती. परस्पर चर्चेनंतरच हा पक्षप्रवेश झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सामंत यांनी सांगितले की, आनंद परांजपे यांनीही कुठेही राष्ट्रवादी नेतृत्वावर नाराजी किंवा टीका केलेली नाही. त्यामुळे या प्रवेशामुळे महायुतीत मतभेद असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले.
इंधन बचतीसाठी ईव्ही वाहनांच्या वापरावर भर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना खर्चात बचत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार उद्योग विभागात ईव्ही वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.