बकरी ईदपूर्वी राज्यभर गोवंश वाहतुकीवर विशेष मोहीम; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

महाराष्ट्र

मुंबई: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गोमातेची तस्करी, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार २५ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग, पोलीस, वाहतूक पोलीस, पशुसंवर्धन विभाग आणि प्राणी कल्याण संस्थांचा समन्वय साधण्यात येणार आहे.

राज्यातील सीमावर्ती भाग, प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर नाकाबंदी करून जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. आवश्यक परवानग्या, प्रमाणपत्रे तसेच प्राणी कल्याण नियमांचे पालन झाले आहे का, याची पडताळणी केली जाईल.

“मोटार वाहन कायदा आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नियमबाह्य वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात येतील,” असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.विशेष पथकांमार्फत अवैध कत्तलखान्यांना होणारा जनावरांचा पुरवठा रोखण्यावर भर दिला जाणार असून, मोहिमेचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत