मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक ॲड. श्रीनिवास बिक्कड यांनी केली आहे.
बिक्कड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या मतलेखात राम मंदिर हे कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचे प्रतीक असल्याने मंदिराशी संबंधित प्रत्येक आर्थिक व्यवहार पारदर्शक असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मंदिरासाठी मिळालेल्या देणग्या, सोने-चांदी, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या नोंदी व वापराबाबत स्पष्ट माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली.
तसेच मंदिरासाठी झालेल्या जमीन खरेदी व्यवहारांबाबत तसेच निधीच्या वापराबाबत विविध माध्यमांमध्ये आलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी, असेही त्यांनी नमूद केले. आरोप निराधार असतील तर वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि गैरव्यवहार झाला असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
राम मंदिर हे कोणत्याही राजकीय पक्षाची मालमत्ता नसून संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचे केंद्र असल्याचे सांगत, मंदिराच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे श्रद्धेवर प्रश्न उपस्थित करणे नसल्याचेही बिक्कड यांनी स्पष्ट केले.