लाल किल्ल्यावरून मोदींचा ‘वंदे मातरम्’चा जयघोष; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना थेट सल्ला

महाराष्ट्र

मुंबई : स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. याच ऐतिहासिक ‘वंदे मातरम्’चा जयघोष यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार आहेत. हा क्षण संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुंबईत पार पडलेल्या **‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’**नंतर पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी ‘वंदे मातरम्’च्या घोषणेवर भाष्य केले. या घोषणेमुळे देशातील नागरिकांमध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची नवी ऊर्जा निर्माण होईल, असे शिंदे म्हणाले.

‘वंदे मातरम्’ हा केवळ घोष नाही, तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी आणि असंख्य स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाशी जोडलेली प्रेरणादायी भावना आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात मोकळेपणाने श्वास घेत आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

त्यामुळे स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाला कोणीही विरोध करू नये, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी जोडलेल्या या घोषणेचा सन्मान राखणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या ‘वंदे मातरम्’च्या घोषणेकडे देशाचे लक्ष लागले असून, या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेलाही उधाण येण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत