मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर हक्कभंगाची भाषा करून नैतिकतेचा आव आणला असून, “दुसऱ्याला सांगे ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण” ही म्हण त्यांच्यावर तंतोतंत लागू पडते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी केली आहे.
मातेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहीहंडी कार्यक्रमातील महिलांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले राम कदम आज संसदीय मूल्ये, संस्कार आणि सभ्य भाषेचे धडे देत आहेत, ही महाराष्ट्रासाठी मोठी विडंबना आहे.
प्रत्येक वादग्रस्त वक्तव्यावर हक्कभंगाची कारवाई करायची असेल, तर सर्वप्रथम भाजप नेत्यांनी स्वतःच्या भूतकाळातील विधानांचे आत्मपरीक्षण करावे. दुसऱ्यांवर बोट दाखवताना उर्वरित तीन बोटे स्वतःकडे असतात, याचे भान त्यांनी ठेवावे, असेही त्यांनी म्हटले.
राज्यातील महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षेसारख्या मूलभूत मुद्द्यांवर उत्तर नसल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप विरोधकांना हक्कभंगाच्या धमक्या देण्याचे राजकारण करत असल्याचा आरोपही मातेले यांनी केला.
लोकशाहीत मतभेद असू शकतात; मात्र विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी संसदीय तरतुदींचा वापर करणे लोकशाहीला शोभणारे नसल्याचे सांगत, सत्ता आली म्हणजे सत्याचा परवाना मिळत नाही आणि विरोधकांना गप्प बसविण्याचा अधिकारही मिळत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
राम कदम यांनी इतरांना नैतिकतेचे धडे देण्यापूर्वी स्वतःच्या वादग्रस्त विधानांबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी. त्यानंतरच त्यांनी इतरांना उपदेश करावा, अन्यथा त्यांची भूमिका “दुसऱ्याला सांगे ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण” अशीच असल्याचे जनतेला वाटेल, असा टोला अमोल मातेले यांनी लगावला.