विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, ड्रग पेरण्याची धमकी; सरकारवर विजय वडेट्टीवारांचा घणाघात

महाराष्ट्र

पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि शेतकरी कर्जमाफीवर सरकारला धारेवर धरले; लोकशाही दडपण्याचा आरोप

नागपूर: आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत असून त्यांना ड्रग पेरण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहण्याऐवजी सरकार त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” असले तरी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना “५० ग्रॅम ड्रगची पुडी ठेवीन” अशी धमकी दिली जात असल्याचे अत्यंत गंभीर आहे. अशा धमक्या देणाऱ्या पोलिसांकडे ड्रग्ज आले कुठून, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भूमिका घेतली असून राज्यभर काँग्रेसने आंदोलन केले आहे. अनेक ठिकाणी पालकही रस्त्यावर उतरल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी केली.

पेपरफुटी प्रकरणावर बोलताना त्यांनी गेल्या दहा वर्षांत अनेक स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेल्याचा आरोप केला. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका करत, विरोधकांवर आरोप करण्यापेक्षा सरकारने स्वतःच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी, असे ते म्हणाले.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. कर्जमाफीचे आकडे फुगवून सांगितले जात असून लाभार्थ्यांच्या यादीतील गोंधळामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत सरकारने पारदर्शक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत