‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

महाराष्ट्र

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून ‘मंडल यात्रा’ची घोषणा.

नागपूर: राज्य सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत असून कर्जमाफीचा गाजावाजा करताना दुसरीकडे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेलाच कात्री लावत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

वडेट्टीवार म्हणाले की, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतून आधीच लाखो शेतकरी वंचित राहिले आहेत. आता ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, त्यांनाच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला जात आहे. एका हाताने मदत दिल्याचे दाखवायचे आणि दुसऱ्या हाताने आर्थिक मदत काढून घ्यायची, ही सरकारची फसवणुकीची नीती असल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारकडे शेतकऱ्यांसाठी निधी नसल्याचे सांगितले जाते, मात्र योजनांच्या जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. कर्जमुक्ती योजनेच्या प्रसिद्धीसाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात आले, पण प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात अपेक्षित मदत पोहोचत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी पुन्हा करताना वडेट्टीवार म्हणाले की, लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना निधी, वसतिगृहे आणि इतर सुविधा मिळत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत त्यांनी ३ ऑगस्टपासून पूर्व विदर्भात ओबीसी हक्कांसाठी ‘मंडल यात्रा’ काढण्यात येणार असल्याची घोषणा केली.

यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी कालव्यालाही मुद्दा उपस्थित केला. कालव्याला पाणी सोडल्यानंतर पहिल्याच दिवशी भगदाड पडल्याची घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत