मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे नाट्यगृह अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा, साहित्याचा आणि सामाजिक वारशाचा प्रसार करणारे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, चिरागनगर येथे अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक आणि संशोधन केंद्राचे काम सुरू असून, त्यांच्या कार्याचा वारसा जतन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. नूतनीकरणानंतर नाट्यगृहात आधुनिक रंगमंच, सुसज्ज ग्रीनरूम, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने दर्जेदार नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी हे नाट्यगृह सक्षम झाले आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णा भाऊ साठे यांनी शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्य वेचल्याचे सांगत, त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी राज्यभर विविध स्मारके उभारली जात असल्याची माहिती दिली. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथेही स्मारक उभारले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, सुमारे ४० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक वातानुकूलित नाट्यगृह ७६१ आसनक्षमतेचे असून, ग्रीनरूम, मेकअप रूम, सीसीटीव्ही, विद्युत जनित्र, आधुनिक अग्निसुरक्षा व्यवस्था, पुस्तक विक्री दालन आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाची सुविधा येथे उपलब्ध करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, उपमहापौर संजय घाडी तसेच अनेक लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.