सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात शिंदे गटाचा युक्तिवाद; ६० आमदारांच्या जनादेशाचा शिंदेंनी केला उल्लेख
मुंबई: शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या मूळ अस्तित्वासंदर्भातील वादावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेत विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षातील फरक, पक्षघटना, अपात्रतेची कारवाई तसेच आयोगाच्या अधिकारक्षेत्रावर सविस्तर युक्तिवाद केला.
सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील अंतिम निर्णय भविष्यातील अशा प्रकरणांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे स्पष्ट केले. आता पुढील आठवड्यात शिंदे गटाकडून प्रतियुक्तिवाद होणार असून या सुनावणीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधत, “शिवसेना कोणाची, याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनेच दिलं आहे. ६० आमदार निवडून देत जनतेने आपला कौल स्पष्ट केला आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर आणि लोकशाहीतील बहुमतावर आमचा पूर्ण विश्वास आहे,” असे माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, माध्यमांशी संवादानंतर एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील दरे गावाचा दौरा आटोपून तातडीने मुंबईकडे प्रस्थान केले. राजकीय वर्तुळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी त्यांनी दौरा अचानक आटोपल्याची चर्चा सुरू असली, तरी याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.