राज्यात ३०,२०९ शिक्षक पदांची भरती सुरू; ११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत

महाराष्ट्र

पवित्र पोर्टलवरून गुणवत्ताधारित प्रक्रिया; १.७० लाख उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षकांच्या ३० हजार २०९ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला पवित्र (Pavitra) पोर्टलवरून सुरुवात झाली आहे. ही भरती पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिली.

टीएआयटी-२०२५ परीक्षेसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार परीक्षेला बसले, तर १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे.

भरतीमध्ये जिल्हा परिषदांची १३,३५१, महानगरपालिकांची १,९५४, नगरपालिकांची २८०, खाजगी संस्थांची १२,१४८, आदिवासी विकास विभागाच्या शाळांची २,४२१ आणि शासकीय विद्यानिकेतनची ५६ अशी एकूण ३०,२०९ पदे भरली जाणार आहेत. यापैकी १९,८८१ पदे मुलाखतीशिवाय, तर १०,३२८ पदे मुलाखतीसह भरली जाणार आहेत.

इयत्ता १ ते ५ साठी १४,३२०, इयत्ता ६ ते ८ साठी १०,०१२, इयत्ता ९ व १० साठी ५,५१३ आणि इयत्ता ११ व १२ साठी ३६४ पदांचा या भरतीमध्ये समावेश आहे.

उमेदवारांना ६ ऑगस्टपासून पवित्र पोर्टलवर पदनिहाय पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली असून ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत पसंतीक्रम लॉक करणे बंधनकारक आहे. त्यानंतर मुलाखतीशिवायच्या पदांची गुणवत्तायादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच भरती प्रक्रियेसंदर्भातील सूचना, मागण्या किंवा तक्रारी उमेदवारांनी edupavitra25@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन शिक्षण आयुक्तांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत