पुणे : पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता असल्याने विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, पुणे पदवीधर मतदारसंघावर भाजपसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केल्याने महायुतीतील जागावाटपाचा पेच वाढण्याची शक्यता आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक हे दोन्ही मतदारसंघ वर्षानुवर्षे भाजपकडे असल्याचे सांगत पक्षाचा दावा स्पष्ट केला आहे. इचलकरंजी दौऱ्यादरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणीचा आढावा घेताना त्यांनी ही भूमिका मांडली.
दरम्यान, भाजपमध्येच पुणे पदवीधरच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पुणे पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारीबाबत संकेत दिल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मात्र, आता कोल्हापूरमधून माणिकराव पाटील चुयेकर यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे. चंद्रकांत पाटील यांचा फोटो असलेले फलक लावत त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत गोटातच उमेदवारीवरून चुरस वाढण्याची चिन्हे आहेत.सध्या भाजपकडून माणिक पाटील आणि शरद लाड यांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भैया माने यांच्या नावाची चर्चा असल्याने महायुतीतील जागावाटपाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघावरही भाजपचा दावा
पुणे शिक्षक मतदारसंघावरही भाजपने दावा केला आहे. भाजपकडून स्वामी विवेकानंद संस्थेचे कौस्तुभ गावडे, तर शिवसेनेकडून मंगेश चिवटे इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुणे पदवीधरसोबतच शिक्षक मतदारसंघावरूनही महायुतीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
“दोन्ही मतदारसंघ भाजपकडे”
चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक हे दोन्ही मतदारसंघ वर्षानुवर्षे भाजपकडे असल्याचे स्पष्ट केले आहे. महायुतीतील जागावाटपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरतो, भाजपचा दावा कायम राहतो की राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळते आणि भाजपकडून नेमका कोणता चेहरा मैदानात उतरतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.