भाजपाकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार

महाराष्ट्र

वर्धा: “आम्हाला भाजपाकडून छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही,” असे ठाम प्रतिपादन काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. माझ्या वक्तव्याची जाणीवपूर्वक मोडतोड करून राज्यात हिंदू-मुस्लीम वाद पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टिपू सुलतानच्या मुद्द्यावर वर्धा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, “महापुरुषांच्या नावावर राजकारण सुरू आहे. समाजात द्वेष पसरवला जात आहे. सर्व महामानवांचे फोटो कार्यालयात लावावेत का? विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे फोटो असावेत का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्या प्रश्नाचे मी उत्तर दिले. मात्र ‘ध’ चा ‘मा’ करण्याची देवेंद्र फडणवीस यांची जुनी खोड जागी झाली आणि त्यांनी माझ्या विधानाला वेगळा अर्थ लावून वाद निर्माण केला.”

सपकाळ पुढे म्हणाले, “मी फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली, त्यांना गजनी म्हटले तेव्हा ते म्हणाले होते, ‘कोण हर्षवर्धन सपकाळ? मी त्यांना ओळखत नाही.’ मात्र आता ते माझ्या नावाने तावातावाने बोलत आहेत. प्रत्येक बाबतीत जात आणि धर्म आणणे हा भाजपाचा जुना फंडा आहे.”

पुण्यात दगडफेक; गुन्हे दाखल करण्याची मागणी

पुण्यातील काँग्रेस कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत दगडफेक केल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. पोलिसांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या व पत्रकार भगिनींवर हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराचा तीव्र निषेध करत चिथावणी देणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी त्यांनी केली.

“मला माफी मागायला लावण्याची भाषा माफीवीरांचा पक्ष करत आहे. पण नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या बॅनर्सवर टिपू सुलतानचे फोटो होते. राज्यातील अमरावती, चंद्रपूरसह २१ ठिकाणी भाजपाने ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) सोबत युती केली आहे. तेव्हा त्यांना काही अडचण नव्हती, मग आता काय बदलले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सावरकर-कोश्यारी प्रकरणावरही सवाल

सपकाळ म्हणाले, “विनायक दामोदर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याबाबत केलेल्या लिखाणाबद्दल किंवा भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांबद्दल भाजपा पुतळे जाळणार का? हा माझा प्रश्न आहे.”

दरम्यान, १७ तारखेला माझे पुतळे जाळण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा वाद उकरून काढला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.