मुंबई : पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय विद्यानिकेतन तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) घेण्यात आली होती. या प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून विविध व्यवस्थापनांतील १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, गुणवत्तेच्या आधारे पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित प्रक्रियेतून निवड झालेल्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्ये आणि मूल्यांची जडणघडण करण्यासाठी शिक्षकांनी समर्पित भावनेने काम करावे. राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी नव्याने निवड झालेल्या शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि गुणवत्ताधिष्ठित पद्धतीने राबविण्यात येत आहे. शिफारस झालेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनवर निवडीची स्थिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच संबंधित उमेदवारांना एसएमएसद्वारेही माहिती देण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
व्यवस्थापननिहाय शिफारस झालेली पदे :
जिल्हा परिषद – ८,४८१
नगरपालिका/परिषदा – २२६
महानगरपालिका – १,३०६
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळा – १,६०१
शासकीय विद्यानिकेतन – ५४
खासगी शैक्षणिक संस्था – १,४५१
इयत्तानिहाय पदसंख्या :
इयत्ता १ली ते ५वी – ७,५४१
इयत्ता ६वी ते ८वी – ४,२०७
इयत्ता ९वी ते १०वी – १,११९
इयत्ता ११वी ते १२वी – २५२
अशाप्रकारे एकूण १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.