ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

राजकीय

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. ‘येत्या काही दिवसांत ठाकरे गटात कोणीच शिल्लक राहणार नाही. ठराविक दोन व्यक्ती सोडल्या तर कोणीच राहणार नाही,’ असा दावा शिवसेना (शिंदे) गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ठाण्यातील दहीहंडी उत्सवांना भेटी देत असताना संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीला उपस्थित राहिल्यानंतर म्हस्के यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज्यातील सुरू असलेल्या राजकीय फोडाफोडीबाबत विचारण्यात आले.

‘राजकीय हंडी ही एकनाथ शिंदेंनी फार पूर्वीच फोडली आहे. त्यांनी दाखवून दिलं की ठाण्याचा एकनाथ शिंदे हंडी फोडू शकतो. आता आगामी फोडाफोडी कळेल. काही दिवसांतच कळेल. कोणीच शिल्लक राहणार नाही,’ असे म्हस्के म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने भुसावळमध्ये शरद पवार गटाच्या नगरसेवकांना आपल्या गटात घेतल्याची चर्चा झाली होती. मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठीही शिंदे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याची राजकीय चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर म्हस्के यांच्या ठाकरे गटाबाबतच्या दाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

संजय राऊतांवरही निशाणा

संजय राऊत यांनी तुरुंगात असताना आपल्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त केल्याच्या मुद्द्यावरूनही म्हस्के यांनी त्यांच्यावर टीका केली. ‘संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रसिद्धीत राहण्यासाठी ते अशी वक्तव्ये करत असतात. ते उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर चढून हंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत,’ अशी टीका त्यांनी केली.राऊत यांच्या वक्तव्यांवर टीका करताना म्हस्के यांनी आक्षेपार्ह भाषेत त्यांच्यावर निशाणा साधला.

राहुल गांधींचा जप कशासाठी?’

संजय राऊत यांच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी असलेल्या जवळिकीवरूनही म्हस्के यांनी टोला लगावला. ‘राहुल गांधींच्या जवळ असल्याचे भासवत आहेत. राहुल गांधी राज्यसभेची संधी देतील, अशी अपेक्षा असावी. कारण इकडे काही नाही. सातत्याने राहुल गांधींचा जप करतात. त्यांना संधी हवी असेल तर राहुल गांधी हा एकमेव पर्याय आहे,’ असे म्हस्के म्हणाले.

दरम्यान, ठाण्यातील दहीहंडी उत्सवाबाबत बोलताना म्हस्के यांनी रामनगरच्या पथकाने नऊ थरांचा विक्रम केल्याचे सांगितले. ‘दहीहंडीची पंढरी म्हणून ठाण्याला ओळखले जाते. संपूर्ण ठाण्याचे वातावरण दहीहंडीमय झाले आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत