मुंबई: सिनेमा किंवा मालिकांच्या शूटिंग सेटवर कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी भरपूर खाण्या-पिण्याची सोय असते. अनेकदा दीर्घकाळ शूटिंग असल्यास दुपारच्या जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व व्यवस्था निर्मात्यांकडून केली जाते. त्यामुळे सेटवर विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद कलाकारांना मिळत असतो.मात्र सध्या निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा परिणाम थेट मालिकांच्या सेटवरही दिसून येत आहे. काही ठिकाणी जेवण तर दूरच, साधा चहाही मिळणे कठीण झाले आहे.
‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेचे निर्माते हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, पूर्वी सेटवर पोळी, भाजी, आमटी, भात असे पूर्ण जेवण दिले जायचे. परंतु गॅसच्या कमतरतेमुळे आता पुलाव, खिचडी, बिर्याणी यांसारखे कमी गॅस लागणारे पदार्थ दिले जात आहेत. तसेच चहा-कॉफीऐवजी लिंबू सरबत, ताक आणि कोकम सरबत दिले जात आहे. गरज भागवण्यासाठी सेटवर इंडक्शनचीही व्यवस्था करण्यात आली आहे.काही मालिकांच्या सेटवर तर चुलीवर जेवण बनवण्याचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे पुलाव किंवा मसाले भातासारखे पदार्थच बनवले जात आहेत.
‘तुला जपणार आहे’ आणि ‘तु अनोळखी तरी सोबती’ या मालिकांच्या सेटवर तर जेवणाची व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या मालिकांच्या निर्माती मनीष दळवी यांनी सांगितले की, कलाकार आणि तंत्रज्ञांना स्वतःचे डबे आणण्यास सांगितले आहे. मात्र यासाठी पुरेसा वेळ लागतो, त्यामुळे शूटिंग उशिरा सुरू करावे लागते आणि त्याचा परिणाम कामाच्या तासांवर होत आहे.
सध्याच्या गॅस टंचाईमागे मध्यपूर्वेतील तणावाचेही कारण असल्याचे सांगितले जात आहे. इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचा फटका आता मनोरंजन क्षेत्रालाही बसताना दिसत आहे.