मुंबई: ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एजेची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेला राकेश बापट सध्या बिग बॉस मराठी च्या सहाव्या सिझनमध्ये सहभागी झाला असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.याआधी तो हिंदी ‘बिग बॉस’मध्येही झळकला होता. अभिनयासोबतच त्याच्या खासगी आयुष्याचीही नेहमी चर्चा होत असते. विशेषतः त्याचं आणि प्रसिद्ध अभिनेत्री रिधी डोगरा यांचं नातं चाहत्यांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलं आहे.
२०११ मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या या जोडीने आठ वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटानंतरही त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध कायम आहेत. तरीही एवढी गोड जोडी वेगळी का झाली, हा प्रश्न चाहत्यांना सतावत होता.याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राकेशची बहीण शीतल हिने महत्त्वाचा खुलासा केला. तिच्या म्हणण्यानुसार, “राकेश आणि रिधी यांच्या नात्यात परस्परांबद्दल खूप आदर होता. पण काळानुसार अपेक्षा वाढल्या आणि त्यातूनच दुरावा निर्माण झाला. नातं जबरदस्तीने टिकवण्यापेक्षा शांततेत वेगळं होणं त्यांनी पसंत केलं.”
ती पुढे म्हणाली की, “नातं एका टप्प्यावर विषारी बनू नये, हीच दोघांची भूमिका होती. राकेश कुणाचाही तिरस्कार करू शकत नाही आणि रिधीचाही स्वभाव तसाच आहे. त्यामुळे घटस्फोटानंतरही त्यांच्यात चांगली मैत्री कायम आहे.”दरम्यान, एका मुलाखतीत रिधीनेही सांगितलं होतं की, “आजही एखादी अडचण आली तर मी राकेशकडून मदत घेते.”एकेकाळी सेटवर सुरू झालेलं प्रेम, लग्न आणि त्यानंतरचा वेगळा मार्ग—या दोघांची कहाणी आजही चाहत्यांसाठी तितकीच भावनिक आणि प्रेरणादायी ठरत आहे.