कोंढण ओढा पुलावर धोका कायम; दुरुस्तीच्या प्रतीक्षेत शिरूर-पाबळ रस्ता

मुख्य बातम्या शिरूर तालुका

सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार, सामाजिक कार्यकर्त्यांचा संतप्त इशारा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर ते कोंढणओढ्यापर्यंत शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीमिश्रित मुरूम टाकून फक्त तात्पुरती मलमपट्टी केली असून आस्थाव्यस्थ पसरलेल्या मुरमामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.तसेच शिरूर–पाबळ रस्त्यावरील कोंढण ओढ्याच्या पूलावरील रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून धोकादायक स्थितीत असूनही संपुर्ण दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येणाऱ्या या पुलाच्या दुरुस्तीसाठी आजवर मुहूर्तही मिळालेला नाही, हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

मुळात हा पूल प्रवाहाची दिशा बदलून चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला असल्याची तक्रार सुरुवातीपासूनच करण्यात येत होती. या गंभीर अनियमिततेविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी काही महिन्यांपूर्वी उपोषण करून आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. मात्र, त्यानंतर दक्षता गुणनियंत्रण समितीचा अहवाल अद्यापपर्यंत उपलब्ध झाला नाही. परिणामी संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

दरम्यान, पुलावरील रस्ता मोठ्या खड्ड्यांनी भरलेला असल्याने वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार होणारे अपघात, उलटणारी वाहने आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी ही परिस्थिती असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बेफिकीर आहे.

स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, सहाय्यक अभियंता अनिल जाधव यांनी या गंभीर समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. “ते अनेकदा कार्यालयात उपस्थित नसतात, शिरूरमध्ये निवासी राहत नाहीत तसेच नागरिकांचे फोनदेखील उचलत नाहीत,” असा आरोप निलेश वाळुंज यांनी केला आहे.याबाबत त्यांनी पुढे इशारा दिला की, “जर लवकरात लवकर कोंढण ओढा पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही, तर मी पुन्हा एकदा उपोषणास बसणार आहे.