शिरूर शहरात वारंवार वीज खंडित; रोहित्रांची क्षमता वाढविण्याची नागरिकांची मागणी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांसह व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने संताप व्यक्त केला जात असून महावितरण प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित भागातील विद्युत रोहित्रांवर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे कमी व्होल्टेज, फेज जाणे आणि सतत वीज खंडित होण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. याचा परिणाम घरगुती वापरासोबतच दुकाने, दवाखाने, लिफ्ट, मोटारी आणि बाजारपेठेतील विविध उपकरणांवर होत आहे.उन्हाळ्यात वाढलेल्या विजेच्या वापरामुळे सध्याची यंत्रणा अपुरी पडत असून विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना याचा मोठा त्रास होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, परिसरातील वीज ग्राहकांनी महावितरण कार्यालयात लेखी निवेदन देत रोहित्रांची क्षमता वाढविणे, अतिरिक्त रोहित्र बसविणे आणि कमी व्होल्टेजचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी केली आहे.महावितरण प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विनित बोरा, सागर चव्हाण, राजेंद्र लोळगे आणि अन्य नागरिकांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत