सुभाष जगताप २९ सप्टेंबरला लाक्षणिक उपोषण, ३० पासून बेमुदत आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गुटखा व नशेली पान विक्रीचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून, तरुणांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने गुटखा बंदीचे आदेश जारी करूनही गावोगावी, महामार्गावरील हॉटेल-ढाबे व पानटपऱ्यांवर उघडपणे गुटखा विक्री सुरू आहे. परंतु या बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्याऐवजी संबंधित पोलिस अधिकारी व बीट अंमलदार माफियांना अभय देत असल्याचा थेट आरोप ग्रामीण विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष सुभाष खंडेराव जगताप यांनी केला आहे.
२९ सप्टेंबर २०२५: तहसील कार्यालय शिरूर येथे लाक्षणिक उपोषण, ३० सप्टेंबर २०२५ पासून बेमुदत आत्मक्लेश आंदोलनकरणार असल्याचे सुभाष जगताप यांनी सांगितले
शिरूर तालुक्यात गुटखा व नशेली पान विक्रीवर तात्काळ बंदीचे आदेश निर्गमित करावेत.गुटखा विकणाऱ्या व्यक्तींवर कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी. गुटखा माफियांना संरक्षण देणारे व जबाबदारीत कसूर करणारे शिरूर, शिक्रापूर व रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यांतील अधिकारी व बीट अंमलदारांना निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करावी.शिक्रापूर पोलिस ठाण्यातील गोपनीय कामकाज सांभाळणारे व अवैध्य धंद्यांकडून वसूली करून अभय देणारे संदीप कारंडे यांची तात्काळ बदली व विभागीय चौकशी करावी अशी लेखी मागणी जगताप यांनी निवेदनात दिली आहे.
गुटखा विक्रीवर बंदी असतानाही तालुक्यात मोकाट धंदा सुरू आहे.पोलिस ठाण्यांचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गुटखा माफियांना संरक्षण देत आहेत.आंदोलन करू नये व वरिष्ठांकडे तक्रार जाऊ नये यासाठी स्वतःवर मानसिक दबाव, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.”जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या यंत्रणेने लोकांचा विश्वास गमावला आहे. कुंपणच शेत खात असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे.”
या आंदोलनाबाबतची माहिती जगताप यांनी थेट राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्यापर्यंत पोचवली आहे.शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये याबाबत प्रचंड संताप असून, प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास हा संताप रस्त्यावर उसळेल, असा इशारा सुभाष जगताप यांनी दिला आहे.