शिरुर व दौंड तालुक्यातील नागरिकांचा संपर्क तुटल्याची चिन्हे
शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीच्या पुलावरुन शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क होत असतो. मात्र सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी झालेले असताना येथील भीमा नदीला देखील पूर आल्याने नदी तुडुंब वाहत असताना असल्याने शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
विठ्ठलवाडी (ता. शिरुर) हे शिरुर व दौड तालुक्याच्या सीमेवरील गाव असून येथील भीमा नदीच्या पुलावरुन दोन्ही तालुक्यांचा संपर्क होत असतो, सध्या सुरु असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे येथील भीमा नदीला पूर आल्याने नदीचे पाणी पुलाला टेकत आहेत, तर नदीच्या कडेला असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी पाण्यात जाऊ लागल्याने शेतकऱ्यांनी मोटार पाण्याच्या बाहेर काढून घेतल्या आहेत. येथील पुलाची उंची कमी असल्यामुळे अनेकदा येथे काही दुर्घटना देखील घडल्या आहेत, तर कित्येकदा सदर नदीचे पात्र कोरडे पडलेले असताना मात्र सध्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत असताना पाणी पुलाला टेकत आहे. परंतु पावसाचा जोर जास्त वाढल्यास तसेच पाणी पातळी वाढल्यास पाणी पुलावरुन वाहत जाणार असल्याने येथील शिरुर व दौंड तालुक्यातील नागरिकांचा संपर्क पूर्णपणे बंद होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली असून नदी कडेच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.