महिला-बालकल्याण विभागाच्या नावाने पैसे उकळल्याचा आरोप; शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
शिरूर (अरुणकुमार मोटे): महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत शासकीय कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत शिरूर परिसरातील १०० हून अधिक महिला-पुरुषांची लाखो रुपयांची कथित आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी आणि पीडितांची रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी करत शिरूर पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी वर्षा इमरान सौदागर शेख (उर्फ वर्षा रासकर), त्यांचे पती तसेच शिरूर नगरपरिषदेतील कर्मचारी सुप्रिया स्वप्नील गोसावी यांनी महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत शासकीय कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. प्रोसेसिंग फी, फाईल चार्ज, कागदपत्रांचा खर्च आदी कारणे सांगून प्रत्येक अर्जदाराकडून १५ हजार ते १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत रक्कम रोख व ऑनलाइन स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या माध्यमातून सुमारे १०० नागरिकांकडून लाखो रुपयांची वसुली करण्यात आली. फसवणूक झालेल्यांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पैसे स्वीकारूनही आजपर्यंत कोणत्याही अर्जदाराला शासकीय कर्ज मंजूर झालेले नाही. वारंवार विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप असून, वर्षा शेख या गेल्या दोन महिन्यांपासून संपर्काबाहेर असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
पीडितांनी भारतीय न्याय संहितेतील फसवणूक व विश्वासघातासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, पीडितांची नावे, भरलेली रक्कम आणि इतर तपशील असलेली यादीही पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर करण्यात आली आहे.
या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली नाही, तर शंभरहून अधिक पीडित महिला-पुरुष शिरूर पोलीस ठाण्यासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील, असा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.
या वेळी नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादीया, सभापती सुनील जाधव, एजाज बागवान, आयेशा सय्यद, सुनिता पोटे, नगरसेवक अभिजित पाचर्णे, संतोष थेऊरकर, उमेश शेळके यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.दरम्यान, या प्रकरणातील आरोप हे तक्रारदारांनी केलेले असून, पोलिसांची चौकशी आणि अधिकृत तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.