शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या विद्यमान आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य यांच्या विकासकामांपेक्षा सोशल मिडियावरील जाहिरातबाजी’वर जास्त भर असल्याची नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा रंगत असुन सोशल मिडियावरील रिल मध्येच फक्त ‘विकास’ दिसत असुन ग्राउंड रियालिटी मात्र वेगळीच आहे.
शिरुर तालुक्यातील गावोगावी रखडलेली विकास कामे, अपुर्ण रस्ते, पाणीटंचाई, गटार, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, शेतकरी प्रश्न आणि मूलभूत सुविधांच्या समस्या कायम असताना लोकप्रतिनिधी मात्र सोशल मिडियावरील रिल, फोटोसेशन अन बॅनरबाजी याच्यातच जास्त व्यस्त असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
तालुक्यातील अनेक भागांत आजही नागरिकांना चांगले रस्ते, शुद्ध पाणी, सुरळीत वीजपुरवठा, आरोग्य सुविधा, शाळांची दुरुस्ती, गावातील स्वच्छता, शेतकऱ्यांना पाणी आणि शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ यासाठी झगडावे लागत आहे. मात्र या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याऐवजी काही लोकप्रतिनिधींचा भर प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यक्रमाचे फोटो टाकणे, शुभेच्छा देणे, उद्घाटनांचे फोटो प्रसिद्ध करणे आणि सोशल मीडियावर ‘कामाचा देखावा’ निर्माण करणे यावरच असल्याची टीका होत आहे.
निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देणारे अनेक लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर प्रत्यक्ष जनतेत कमी आणि मोबाईलच्या स्क्रीनवर जास्त दिसू लागले आहेत. गावातील एखादी छोटी भेट, एखादा कागद दिला, कुठे उपस्थिती लावली किंवा अधिकाऱ्यांसोबत फोटो काढला तरी त्याचे मोठे पोस्टर करुन सोशल मीडियावर प्रसार केला जातो. परंतु त्या भेटीतून प्रत्यक्ष किती कामे मार्गी लागली, किती निधी आला, किती कामे पूर्ण झाली, याचा हिशोब मात्र जनतेसमोर मांडला जात नाही.
शिरुर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची अनियमितता, गटारांची समस्या, शेतरस्त्यांचे प्रश्न, अवैध माती व वाळू उपसा, वाहतूक कोंडी, आरोग्य उपकेंद्रांची कमतरता आणि शाळांच्या पायाभूत सुविधांबाबत नागरिकांची नाराजी दिसून येते. या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरण्याची गरज असताना अनेक ठिकाणी केवळ निवेदन, फोटो आणि पोस्ट एवढ्यावरच विषय संपवला जात असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे.
तालुक्यातील जनतेला आता केवळ सोशल मीडियावरील चमकदार पोस्ट नकोत, तर प्रत्यक्ष जमिनीवर दिसणारी कामे हवी आहेत. लोकप्रतिनिधींनी किती उद्घाटने केली. यापेक्षा किती कामे पुर्ण केली, किती गावांना निधी मिळवून दिला, किती समस्या कायमस्वरूपी सोडवल्या आणि किती नागरिकांना दिलासा दिला, याची उत्तरं देण्याची वेळ आता आली आहे.
तसेच नागरिकांमध्ये अशीही चर्चा आहे की, काही लोकप्रतिनिधींच्या सोशल मीडिया पेजवर विकासाचा महापुर दिसतो; मात्र गावात गेल्यावर वास्तव वेगळेच दिसते. फोटोमध्ये विकास आणि प्रत्यक्षात समस्या, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी दिसत असल्याने जनतेत असंतोष वाढत आहे. जाहिरातबाजी करुन काही काळ जनतेचे लक्ष विचलित करता येईल; पण मूलभूत प्रश्न कायम राहिले तर जनतेचा रोष वाढणार हेही तितकेच खरे आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणे चुकीचे नाही; मात्र प्रसिद्धीच्या मागे प्रत्यक्ष काम असणे गरजेचे आहे. अन्यथा ‘काम कमी आणि गाजावाजा जास्त’ अशी प्रतिमा सगळ्याच लोकप्रतिनिधींसाठी अडचणीची ठरु शकते.
शिरुर तालुक्यातील जनता आता पुर्वीसारखी केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणारी राहिलेली नाही. नागरिकांना आता कामाचा पुरावा हवा आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टपेक्षा गावातील रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि शेतकरी प्रश्न यावर केलेली ठोस कामगिरीच खरी प्रसिद्धी ठरणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आता फोटोसेशनपेक्षा विकासकामांना प्राधान्य द्यावे, अशी स्पष्ट मागणी तालुक्यातून पुढे येत आहे.