मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती…

आरोग्य

कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे 

१) सतत पॉझीटीव्ह:- कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं. उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे.

प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे. उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो. आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात.

२) प्रेमात पडा:- आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं. पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन. त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन. कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल.त्याच्याशिवाय आपण जगु शकत नाही, आणि, मग एके दिवशी जगही आपल्याला त्या एकाच गोष्टीसाठी ओळखु लागतं. सचिन-क्रिकेट, धीरुभाई-रिलायन्स, अमिताभ-एक्टींग, लता मंगेशकर-गायन, मोदी-नेतृत्व, पटनायक-वाळुची शिल्पे, प्रकाश आमटे-आनंदवन, श्रीश्री रविशंकर गुरुजी – आर्ट ऑफ लिविंग, स्टीव्ह जॉब्ज-गॅझेट्स,ह्या यादीत आपलंही नाव येऊ शकतं, आपणही आपल्या पॅशनसाठी वेडं बनलो तर

३) महिन्याला दोन पुस्तके:- माझ्या आयुष्यातल्या अत्यंत वाईट आणि पडत्या काळामध्ये मला फक्त आणि फक्त चांगल्या विचारांच्या पुस्तकांनीच तारलं, नाहीतर कदाचित मी आज हा लेख लिहायला शिल्लकच राहीलो नसतो, इतके पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. महिन्याला कमीत कमी दोन तरी चांगली पुस्तके तरी वाचुनच काढेन आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी तात्काळ जीवनात आणेन, हा चंगच बांधावा, आपोआप जे जे हवे ते सारे मिळत जाते, हा माझा स्व-अनुभव आहे.

४) डायरी लिहा:- दररोज घडलेल्या बर्‍या वाईट घटना आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन जातात, त्यांना शब्दबद्ध करत गेलं की जगण्याची रंगत वाढत जाते. माझ्या मनात चाललेले द्वंद बाहेर काढण्यासाठी मला ह्या डायर्‍यांनी खुप मदत केली. झालेले अपमान, आलेले अपयश, भविष्याच्या चिंता, मनाचं रिकामपण, सगळी मळमळ मी बाहेर काढली, आणि प्रत्येक जखम डायर्‍यांमध्ये जपुन ठेवली, आणि शहाण्या बाळांसारखं त्या सर्वांनीही मला त्रास देणं बंदच करुन टाकल. आजही माझ्या कॉम्पूटर मध्ये मी स्वतःलाच लिहलेली शेकडो पत्रं आहेत, जी वाचुन मला आता खुप गंमत वाटते. कधी छोट्यामोठ्या कारणाने मी खचलो की ते वाचुन प्रचंड बळ मिळतं. बॅटरी पुन्हा टणाटण चार्ज होते.

५) जे सुरु केलंय त्याचा शेवट करा:- हातात घेतलेलं काम पुर्ण करायचं म्हणजे करायच. मनावर विजय मिळवण्यासाठी मनाचाच वापर करायचा, काम सुरु होतानाच असं भासवायचं की ते पुर्ण झालेलं आहे. आणि मन गोंधळुन जातं आणि ते पुर्ण करुनच एका जागेवर शांत बसत. ‘आसान है’ हा यशाचा मुलमंत्र नेहमी लक्षात ठेवायचा.

६) कंफर्ट झोन तोडा. नवी आव्हाने स्वीकारा:- तु मागच्या एक महिन्यामध्ये अशी कोणतीही एक गोष्ट केलीस का, जे तुला येत नाही, जे करण्याची तुला भिती वाटते? मी असा वेडेपणा खुपदा केलाय, मला पेंटींग येत नसताना मी माझ्या ऑफीसला स्वतःच्या हातानी पेंट दिला. मागच्या वर्षी, माझी खरी ओळख लपवुन मी गावाबाहेरच्या एका सुताराच्या हाताखाली मी एक आठवडा रोज चार तास हेल्पर म्हणुन काम केलं. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी बॅग भरुन घराबाहेर पडलो, पण मी कुठे जाणार मलाच माहित नव्हते, त्या पाच दिवसात मी अनेक गडकिल्ले भटकुन आलो. अनेक थरारक अनुभव घेतले, स्वतःसोबत घालवलेले ते पाच दिवस मी कधीही विसरणार नाही. नवरात्रीमध्ये उजनी-तुळजापुर हे सदतीस किलोमीटर अंतर मी एका रात्रीत चालत गेलो, तो ही एक आनंददायी आणि अविस्मरणीय अनुभव होता.

७) कमीत कमी तीस मिनीट व्यायाम:- मनाला ताजंतवाणं ठेवण्याचा हुकुमी एक्का आहे, शरीराला व्यायाम करायला भाग पाडायचं, मन आपोआप ताळ्यावर येत. जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीला हे सुत्र माहित आहे.

८) ध्यान, सर्व समस्यांवर रामबाण उपाय:- तुझं शारीरीक व्यंग हे तुझ्या आयुष्यात कधीही अडथळा बनु शकत नाही, कारण तु म्हणजे तुझं शरीर नाहीस. खरा तु तर वेगळाच कोणीतरी आहेस, हे तुला ध्यान करायला लागलं की आपोआप उमगत जाईल. आतापर्यंत केला नसशील तर एकदा आर्ट ऑफ लिविंगचा हॅपिनेस कोर्स नक्की कर.

९) महिन्याला एक वाईट सवय सोडा:- आपल्या प्रत्येकामध्ये वाईट सवयी असतात, मी एका महिन्याला एक वाईट सवय सोडायची आहे, आणि एक चांगली सवय जोडायची आहे, असं प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अंतर्मनाला सांगतो. महिनाभर त्याची कसोशीने अंमलबजावणी करतो.

१०) आपल्या आजुबाजुला प्रसन्नतेचा शिडकावा करा:- घरातुन बाहेर पडण्याआधी एकदा आरशात बघुन स्वतःलाच वचन देतो की आज माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद आणि प्रसन्नता वाटणार आहे.

प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसु फुलवणार आहे:- कधी एखाद्या उपाशी माणसाला पोटभर खावु घालावं, कधी एखाद्या लहान मुलाशी लहान बनुन खेळाव. कधी रस्त्याने जाताना कोणाला लिफ्ट द्यावी, कधी जोक्स सांगुन लोकांना खळखळुन हसवावे.

११) जे मिळालयं त्याबद्द्ल कृतज्ञ रहा:- जो कृतज्ञ आहे, त्यालाच ब्रम्हांड अजुन जास्त भरभरुन देतं, हेच सिक्रेट आहे. आपल्याला मिळालेल्या दहा वरदानांबद्द्ल रोज मनःपुर्वक आभार व्यक्त केल्यास आयुष्यातली सगळी दुःखे आपोआप नाहीशी होतात, याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे.

१२) यशस्वी लोकांसोबत मैत्री करा:- असे लोक ज्यांनी स्वतःचा ठसा ह्या जगात उमटवला आहे, त्यांच्याशी अधिकाधिक ओळखी कराव्यात, त्यांच्याशी भेटण्याच्या संधी शोधाव्यात. यश ही उत्साहासारखं संसर्गजन्य असतं.

१३) सुरक्षित अंतर ठेवा:- जे लोक आपलं मानसिक खच्चीकरण करतात, आपली टर उडवतात, अशा लोकांपासुन चार हात दुर रहावे. निगेटीव्ह लोकांना आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनात कुठेही स्थान देऊ नये.

१४) तीस दिवसांचा प्लान:- पुढच्या तीस दिवसात मी काय करणार आहे, ह्याचा प्लान महिन्याच्या सुरुवातीला तयार करुन भिंतीला चिटकवुन टाकावा.

(सोशल मीडियावरुन साभार)