उपवासाच्या भगरीचे आरोग्यदायी फायदे…

आरोग्य

आपण उपासाच्या दिवशी भगर म्हणजेच वरीचे तांदूळ खातो. उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी सहसा आपण भगर खात नाही. भगरीसारखे सकस अन्न, फक्त उपवासासाठी न वापरता, आपण त्याचा रोजच्या आहारात उपयोग केला पाहिजे. त्याद्वारे शरीराला पोषक आहार मिळून ऊर्जा टिकून राहील.

१) लो ग्लायसेमिक इंडेक्स हा आजचा परवलीचा शब्द आहे. म्हणजे यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि हे कार्बोहायड्रेट पचायला सोपे असते. भगरचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेह असणाऱ्या लोकांनी भाताच्या ऐवजी भगर खाणे जास्त चांगले.

२) भगरीमध्ये कॅलरी कमी व प्रोटीन जास्त असते. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी भगर उपयुक्त ठरते. तांदूळ, गहू, ज्वारी या धान्यापेक्षा भगरीत कॅलरी कमी असतात. जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी भगर खाऊन सुद्धा अंगात शक्ती येते.

३) भगरीत ग्लूटेन नसते. ग्लूटेन हा धान्यात आढळणारा एक चिकट पदार्थ आहे. ग्लुटेनयुक्त पदार्थ खाल्ल्याने अनेक जणांना अपचन होते. पिझा, पास्ता, ब्रेड यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते. पचनाच्या तक्रारी असतील तर आहारात भगरीचा समावेश करावा.

४) भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात. पोट भरल्याची भावना लवकर येते. जेवण कमी जाते पण पोट भरते. भगर खाल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो. गॅसेस होत नाहीत. अपचन होत नाही.

५) लहान बाळाला पहिल्यांदा बाहेरचे अन्न देताना भगरीची खीर करून द्यावी. अगदी सहाव्या सातव्या महिन्यापासून ही खीर दिली तरी चालेल. बाळासाठी हा उत्तम पोषक आहार आहे.

५) इतर धान्यापेक्षा भगरीतून जास्त आयर्न मिळते. ऍनेमियाचा त्रास असेल, शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर भगर उपयोगी आहे. १०० ग्राम भगरीतून १८.५ मिलीग्राम आयर्न मिळते.

६) भगरीत सी, ए आणि इ व्हिटॅमिन असतात. तसेच खनिजे सुद्धा असतात. साध्या भातापेक्षा भगरीमध्ये जास्त अँटिऑक्सिडंट्स असतात. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी भगर उपयोगी आहे.