कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर मेसाई या ठिकाणी एकूण 43 टक्के मतदानाची नोंद झाली. कान्हूर मध्ये मतदानाचा टक्का घसरला असल्याचे पाहायला मिळाले. अनेक राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्याला जास्त प्रमाणात मतदान कसे होईल त्यासाठी प्रयत्न केले आहे. परंतु शेतकऱ्यामध्ये पाण्यामुळे असलेली नाराजी मात्र दुर झालेली नसल्याचे मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारी वरुन दिसुन आले.
“आधी पाणी द्या मग मत घ्या” अशी कान्हूर मेसाई येथील मतदारांमध्ये चर्चा आहे. अनेक मतदार मतदान केंद्रावरच न आल्याने कान्हूर मेसाई मध्ये मतदानाची टक्केवारी घसरली आहे. वर्षानुवर्षे नागरिकांना राजकीय पुढाऱ्यांकडुन नुसती आश्वासनाची गाजर दाखवून मत घेतली जातात. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ च असुन परिणामी यंदाच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदान न करण्याचाच पवित्रा घेतला. म्हणुनच कान्हूर मधील मतदानाची टक्केवारी जास्त प्रमाणात घसरली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत कान्हूर मेसाई ग्रामस्थ काय पवित्रा घेणार…? याकडे संपुर्ण शिरुर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीच्या दरम्यान कान्हुर मेसाई येथील पंचवीस ते तीस युवकांनी एकञ येऊन “आधी पाणी द्या, मग मतदान घ्या” असा पविञा घेतला होता. सुमारे आठवडाभर हे तरुण गावात फिरुन नागरिकांना भेटून मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी आग्रह करत होते. हि बाब पोलीसांच्या कानावर पडताच पोलीसांनी यातील काही तरुणांना बोलावून घेत समज देऊन सोडून दिले. माञ आपल्या न्याय हक्कासाठी लढणा-या तरुणांवर पोलिसांमार्फत दबाव टाकला जातोय ही बाब ग्रामस्थांना खटकली परिमाणी ग्रामस्थांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याने मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
कान्हूर मेसाई मध्ये पाण्याची गंभीर समस्या परंतु राजकीय नेत्यांची फक्त आश्वासन