मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील रामजीनगर परिसरातील तुंबलेली सार्वजनिक शौचालये, अस्वच्छता आणि प्रचंड दुर्गंधीमुळे स्थानिक महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे. या प्रश्नावर त्यांनी मुंबई महापालिकेच्या परिमंडळ-६ चे उपायुक्त आणि ‘एन’ विभागाच्या सहायक आयुक्तांना ई-मेलद्वारे पत्र पाठवत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
रामजीनगर येथील महिलांच्या सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था दूर करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी महापालिका प्रशासनाला प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले होते. त्यावर १६ जून रोजी महापालिकेने आवक शिक्का देऊन निवेदनाची पोचही घेतली. मात्र, दोन महिने उलटूनही शौचालयांची स्वच्छता किंवा दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप मातेले यांनी केला आहे.
दरम्यान, रविवारी सायंकाळी रामजीनगर परिसरातील काही महिलांनी ॲड. अमोल मातेले यांच्या कार्यालयात भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. शौचालये पूर्णपणे तुंबलेली असून अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे वापर करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
“एकीकडे मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणवले जाते आणि दुसरीकडे महिलांना रात्रीच्या वेळी उघड्यावर शौचास जाण्याची वेळ येत असेल, तर ही महापालिका प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे. रात्रीच्या अंधारात उघड्यावर जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल ॲड. मातेले यांनी उपस्थित केला.
महिलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन तुंबलेल्या शौचालयांची तातडीने साफसफाई व दुरुस्ती सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास परिसरातील महिलांना सोबत घेऊन महापालिकेच्या ‘एन’ विभाग कार्यालयावर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.