नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानांतर्गत’ निवड झालेल्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आज नाशिक येथे उद्घाटन झाले. दीपप्रज्वलन आणि ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने शिबिराची सुरुवात करण्यात आली.
या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव, महाराष्ट्राच्या सहप्रभारी रेहाना चिश्ती, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, प्रशिक्षण विभागाचे महाराष्ट्र प्रमुख आशुतोष शिर्के, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, राजाराम पानगव्हाणे आदी उपस्थित होते.
काँग्रेसचे संघटन अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याबरोबरच तळागाळातील कार्यकर्ते व जनतेशी थेट संवाद वाढविण्याच्या उद्देशाने या निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवसांच्या शिबिरात काँग्रेसची विचारधारा, संघटनात्मक बांधणी, नेतृत्व विकास, जनसंपर्क, निवडणूक व्यवस्थापन आणि आगामी राजकीय आव्हानांबाबत नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, या दहा दिवसांत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणाच्या नवव्या दिवशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल मार्गदर्शन करतील, तर समारोपासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी मांडत असलेली भूमिका जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून पुढे नेली जाईल, असेही सपकाळ म्हणाले.
‘महिला विधेयकावर भाजपकडून बुद्धीभेद’
पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राहुल गांधी यांनी या कार्यक्रमात सर्व जाती-धर्मातील महिलांच्या प्रश्नांवर भूमिका मांडली; मात्र भाजपकडून या विषयाला धार्मिक रंग दिला जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.
महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्येच संसदेत मंजूर झाले आहे. मात्र महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपला डिलिमिटेशन विधेयक आणायचे आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा सपकाळ यांनी केला.
‘एसआयआरचे काम घाईगडबडीत’
एसआयआरचे काम घाईगडबडीत सुरू असून १७ ऑगस्टची मुदत आणखी दोन-तीन महिन्यांनी वाढविली असती तर प्रक्रिया सुरळीत झाली असती, असे सपकाळ यांनी सांगितले. भाजपकडून मतचोरी होत होती, आता मतदार याद्याही चोरण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
नागपूरमधील हैदराबाद हाऊसमध्ये बीएलओंना बोलावून मॅपिंगचे सर्व दस्तऐवज घेण्यात आल्याचा आरोप करत सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा आणि कार्यालयाचा अशा प्रकारे वापर करण्यावर प्रश्न उपस्थित केला. “अशाच पद्धतीने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून चालवायचे आहे का?” असा सवाल त्यांनी केला.