अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट (धारणी-चिखलदरा) परिसरात एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत कुपोषणाशी संबंधित ९२ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मेळघाट परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून कुपोषण ही गंभीर समस्या कायम आहे. अज्ञान, गरिबी, अपुरा सकस आहार, स्थलांतर आणि आरोग्य सुविधांचा अभाव ही यामागची प्रमुख कारणे मानली जात आहेत. विशेषतः माता आणि बालकांच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष न दिल्याने बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, कुपोषणामुळे मुलांची वाढ खुंटणे, वजन न वाढणे, तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी होणे असे दुष्परिणाम दिसून येतात. याशिवाय रक्तक्षय (अॅनिमिया) ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. ग्रामीण व आदिवासी भागात स्वच्छ पाणी, पोषणयुक्त अन्न आणि प्राथमिक आरोग्य सेवा यांचा अभावही परिस्थिती अधिक गंभीर करत आहे.
दरम्यान, राज्यात आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२६ साठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असताना, याच राज्यातील कुपोषणाचा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर येत आहे. यामुळे “विकासाच्या जोडीला पोषण” हा मुद्दा अधोरेखित होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, कुपोषण रोखण्यासाठी अंगणवाडी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, गरोदर माता व बालकांसाठी पोषण आहार, लसीकरण, तसेच स्वच्छता आणि जनजागृती यावर भर देणे अत्यावश्यक आहे. तसेच कुपोषित बालकांसाठी न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर (NRC) अधिक सक्षम करणे गरजेचे आहे.दरम्यान, मेळघाटातील वाढत्या कुपोषणाच्या घटनांमुळे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.