२ वर्षांत बारामती परिमंडलाने दिल्या ६१७९४ शेती वीजजोडण्या

महाराष्ट्र

बारामती: दोन वर्षांत महावितरण बारामती परिमंडलाने शेतीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात आघाडी घेतली असून, एकूण ६१ हजार ७९४ वीजजोडण्या देण्याचे काम केले आहे. ३० मीटर अंतरातील प्रतिक्षा यादी जवळपास संपली आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या वीज यंत्रणेपासून जोडणीचे ठिकाण ३० मीटरपर्यंत असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करुन कोटेशन भरावे अशा सर्व शेतकऱ्यांना ३१ मार्चच्या आत कनेक्शन देण्याचे निर्देश मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी परिमंडलातील अभियंत्यांना दिले आहेत.

शेतीपंपाच्या जोडणी करिता एप्रिल २०१८ पासून मार्च २०२२ पर्यंत ६९ हजार ९८३ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. ह्या जोडण्या देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘कृषी धोरण-२०२०’ आणले. या धोरणानुसार दोन वर्षांत जी वसुली झाली त्यातील ३३ टक्के ‘कृषी आकस्मिक निधी’ गावपातळीवर व ३३ टक्के निधी जिल्हा पातळीवर उपलब्ध झाला. त्यातून प्रलंबित जोडण्या देणे व वीज यंत्रणा सक्षमीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले.

अंतरानुसार प्रलंबित जोडण्याची संख्या पाहिली असता ३० मीटरच्या आतील ५० हजार ३१३ जोडण्यांपैकी ५० हजार ८९ जोडण्या आज रोजी दिल्या आहेत. ३१ ते २०० मीटर अंतरातील १२ हजार १६० पैकी ९२६२ तर २०१ ते ६०० मीटरपर्यंतच्या ७५१० पैकी २३२४ जोडण्या दिल्या आहेत. याशिवाय ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या ११९ शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे वीज जोडणी देण्याचे काम महावितरण बारामती परिमंडलाने केले आहे. तसेच उर्वरित जोडण्या देण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे.

नजीकच्या शाखा कार्यालयात संपर्क साधावा

ज्या शेतकऱ्यांची ३० मीटर अंतरातील जोडणी प्रलंबित आहे किंवा ज्यांना नव्याने अर्ज करायचा असेल त्यांनी नजीकच्या महावितरण शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा. या सर्व शेतकऱ्यांना तातडीने नवीन जोडण्या देण्यात येतील असे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी सांगितले.

२४ वीज उपकेंद्रांचे काम प्रगतीपथावर

कृषी आकस्मिक निधीतून बारामती परिमंडलात सद्यस्थितीत २४ वीज उपकेंद्रांचे काम हाती घेण्यात आले आहे. तर ३९ उपकेंद्रातील अतिउच्चदाब रोहित्राची क्षमतावाढ केली आहे. परिणामी महावितरणची भार क्षमता वाढल्याने शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करणे व नवीन जोडण्या देणे शक्य झाले आहे.