माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांच रोखठोक भाष्य

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: राज्यातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे शेतकरी संघटनांत तीव्र संताप पसरला आहे. त्यात भर म्हणून, विधिमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळताना त्यांचा व्हिडिओ आमदार रोहित पवार आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर सादर केल्याने विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. मात्र, कोकाटे यांनी या सर्व आरोपांना नकार देत, मी फक्त मोबाईलवरील जाहिरात स्कीप करत होतो, असा बचाव केला आहे.

या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, सभागृहातील प्रकारामुळे संबंधित निर्णय विधानसभाध्यक्ष किंवा विधानपरिषद सभापती यांच्या अखत्यारित येतो. अजित पवार यांनी कोकाटेंची अद्याप बैठक झालेली नसली तरी लवकरच त्यांची भेट होणार असल्याचे सांगितले. त्यांनी हेही स्पष्ट केले की कोकाटे यांचे मागील वर्तन लक्षात घेता यावेळी योग्य ती समज देण्यात येईल आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मिळून त्यांच्या पदाच्या भवितव्याबाबत निर्णय घेतील.

राजकीय जीवनात आणि प्रमुख पदावर काम करत असताना प्रत्येकाने भान ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, हेच माझं सांगणं आहे. मागे एकदा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून असंच घडलं होतं, तेव्हाही मी त्यांना समज दिली होती. इजा झालं, बिजा झालं आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका असं मी माणिकराव कोकाटेंना सांगितलं आहे. माझी त्यांची आता जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा मी काय कारवाई करायची ते बघेन, असे स्पष्ट शब्दात अजित पवारांनी सांगितले.