अवकाळी पावसाचा तडाखा; राज्यात हवामान बदलाची चाहूल, उन्हाळ्याबाबत नवा अंदाज

महाराष्ट्र

मुंबई: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वादळी पाऊस, गारपीट आणि विजांच्या कडकडाटामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग (IMD) ने एप्रिल, मे आणि जून या कालावधीसाठी हवामानाचा ताजा अंदाज जाहीर केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल महिन्यात राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मात्र एप्रिलमध्ये पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असते, त्यामुळे “जास्त पाऊस” म्हणजे अतिवृष्टी होईल असे नाही. सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे.

तापमानाच्या दृष्टीने पाहता, एप्रिल महिन्यात दिवसाचे कमाल तापमान बहुतेक ठिकाणी सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः मराठवाड्यात उष्ण रात्रींचा त्रास जाणवू शकतो.

दरम्यान, एप्रिल महिन्यात मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव राहण्याची शक्यता असून हा कालावधी सुमारे ७ ते ८ दिवसांचा असू शकतो. दक्षिण महाराष्ट्रातही काही ठिकाणी १ ते २ दिवस उष्णतेची लाट जाणवू शकते. एप्रिल ते जून दरम्यान मराठवाडा, विदर्भाचा पूर्वेकडील भाग आणि उत्तर कोकणात उष्णतेच्या लाटांचा कालावधी आठवडाभरापर्यंत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या उत्तर भारतात सक्रिय असलेल्या पश्चिमी अडथळ्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे. त्यामुळे ७ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत वादळी हवामान कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्टही जारी केले आहेत. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, यंदा पॅसिफिक महासागरात ‘एल निनो’ तयार होण्याची शक्यता असली तरी एप्रिल ते जून या कालावधीत स्थिती न्यूट्रल राहू शकते. ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ या प्रक्रियांमुळे जागतिक हवामानावर मोठा परिणाम होत असतो.

दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, हलके व सुती कपडे वापरावेत तसेच गरज असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.बदलत्या हवामानामुळे शेती आणि पशुधनावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, यासाठी शासकीय पातळीवर नियोजन होणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.