मुंबई: भारताचे तंत्रवैभव जगासमोर मांडले जात असताना भारत मंडपम येथे युथ काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर तीव्र टीका केली.
इंडिया ऑल इम्पॅक्ट सुममित च्या पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रकाराला त्यांनी “देशप्रेम नव्हे, तर देशद्रोह” असे संबोधले. काँग्रेसने आणि त्यांच्या नेत्यांनी देशातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
‘एक्स’वरील पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, भारत-अमेरिका कराराला विरोध असेल तर काँग्रेसने सैद्धांतिक भूमिका मांडावी. मात्र भारत मंडपममध्ये गोंधळ घालत, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून विदेशी पाहुण्यांसमोर देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
परदेशात जाऊन भारताविषयी अपप्रचार करणारे राहुल गांधी यांच्यासारखे नेते असताना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार, असा टोला देखील शिंदे यांनी लगावला.
शिवसेनेचे काँग्रेसविरोधात आंदोलन
दरम्यान, शनिवारी दुपारी मुंबईतील बाळासाहेब भवन येथे शिवसेनेच्या वतीने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. “राहुल गांधी मुर्दाबाद”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात माजी महापौर दत्ता दळवी, माजी नगरसेवक कमलेश राय, शिवसेना सचिव व चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार, माजी नगरसेवक राजू पेडणेकर, दिलीप नाईक, विभागप्रमुख गणेश सानप, निलम पवार तसेच महिला आघाडी, युवती सेना आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.काँग्रेस देशद्रोही आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शैनाज NC यांनी केली.