धुळे: धुळे शहरातील एका अल्पवयीन मुलीच्या दीक्षा सोहळ्यावरून वाद निर्माण झाला असून वडिलांनी संबंधित जैन आचार्यांना कायदेशीर नोटीस पाठवत सोहळा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. ही दीक्षा १४ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे होणार असल्याची माहिती आहे.
उपलब्ध माहितीनुसार, जैन धर्मगुरू आचार्य मुक्तिवल्लभसूरी यांच्या आज्ञेनुसार संबंधित मुलीचा दीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुलगी प्राप्ती (जन्म : १३ जून २००८) ही सध्या १८ वर्षांखालील असून कायद्याने अल्पवयीन आहे.
वडिलांचा विरोध
धुळे येथील मनोज सुवालाल कांकरिया यांनी ऍड. राहुल शिकारे यांच्या माध्यमातून जैन समाजातील गच्छाधिपती राजेंद्रसुरीश्वरजी यांना नोटीस पाठवून आपला विरोध नोंदवला आहे. कांकरिया दाम्पत्याचा १३ ऑक्टोबर २०२१ रोजी कौटुंबिक न्यायालयाद्वारे घटस्फोट झाला असून न्यायालयाच्या आदेशानुसार दोन मुलींचा ताबा वडिलांकडे आहे.
कांकरिया यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे की, जैन समाजाच्या परंपरेनुसार वडिलांची लेखी परवानगी घेतल्याशिवाय दीक्षा देता येत नाही. मात्र, प्राप्तीच्या दीक्षेला त्यांनी स्पष्ट विरोध दर्शवला असून त्यांच्या संमतीशिवाय दीक्षा देणे चुकीचे व बेकायदेशीर ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
आईचा आग्रह, आचार्यांचा निर्धार
मुलीची आई दीक्षेसाठी आग्रही असल्याचे समोर आले आहे. संबंधित आचार्यांचे सध्या वास्तव्य रॉयल पॅलेस, गोरेगांव येथे असून, त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली भूमिका मांडल्यानंतरही दीक्षा देण्याबाबत ते ठाम असल्याचा दावा वडिलांनी केला आहे.
कायदेशीर प्रश्नचिन्ह
अल्पवयीन मुलीच्या धार्मिक दीक्षेबाबत पालकांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने हे प्रकरण कायदेशीर व सामाजिक दृष्ट्या संवेदनशील बनले आहे. १८ वर्षांखालील व्यक्ती कायद्याने सज्ञान नसल्याने तिच्या संमतीची वैधता, पालकांचा संरक्षक हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्य यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, १४ मार्च २०२६ रोजी होणारा दीक्षा सोहळा रद्द करण्याबाबत संबंधितांकडून अधिकृत भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही. पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.