पुण्यातील वाढत्या अत्याचार, ड्रग्ज, कोयता गँग आणि भूमिगत रस्ता प्रकल्पातील भ्रष्टाचारावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जोरदार टीका
पुणे: “देवेंद्र फडणवीस हे ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ असल्याचे पोस्टर्स शहरभर लावले जात आहेत, मात्र त्यांच्या काळात पुण्यात महिलांवरील अत्याचार, ड्रग्जचा विळखा, कोयता गँग आणि गुंडगिरी वाढली आहे,” असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
पुण्यातील संविधान चौक, वानवडी येथे उभारण्यात आलेल्या ४५ मीटर उंच ध्वजस्तंभाच्या लोकार्पण सोहळ्यात आणि काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. हा कार्यक्रम काँग्रेस नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता. यावेळी अरविंद शिंदे, रमेश बागवे, मोहन जोशी, अभय छाजेड, दीप्ती चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले की, “जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत पुण्यात लैंगिक अत्याचाराची ७०० प्रकरणे समोर आली आहेत. दररोज एक बलात्कार होत आहे. ड्रग्जचा खुलेआम व्यापार सुरू आहे. गुलटेकडी मार्केट यार्ड परिसरात गुंडांचा हस्तक्षेप वाढला असून कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात नसरापूर येथील चार वर्षीय पीडित बालिकेसह महिला व बाल अत्याचारातील पीडितांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.
यावेळी सपकाळ यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्यावरही गंभीर आरोप केले. “एपस्टिन फाईल्समध्ये काही भारतीयांची नावे समोर आली असून त्यात नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री हरदिप पुरी यांचाही उल्लेख आहे. या प्रकरणानंतर मोदी अमेरिकेच्या दबावाखाली काम करत आहेत,” असा दावा त्यांनी केला. युद्धबंदी, व्यापार करार आणि रशियाकडून कच्चे तेल खरेदीबाबत अमेरिकेच्या दबावाखाली निर्णय घेतले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
राष्ट्रीय ध्वजाबाबत बोलताना सपकाळ म्हणाले, “तिरंग्यासाठी हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही. संविधान आणि तिरंग्याच्या सन्मानासाठी लढा देणे आवश्यक आहे.”
पुण्यात प्रस्तावित ३४ हजार कोटी रुपयांच्या ५४ किलोमीटर भूमिगत रस्ता प्रकल्पावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार असून कोणतीही जनसुनावणी न घेता हा प्रकल्प रेटला जात आहे. नगरसेवकांनाही विश्वासात घेतलेले नाही,” असा आरोप त्यांनी केला.