‘डोह’कार श्री.वि. कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रद्धांजली

महाराष्ट्र

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘डोह’कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी (श्री.वि.) यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, श्री.वि. कुलकर्णी यांनी आपल्या सूक्ष्म निरीक्षणशक्ती, निसर्गप्रेम आणि जीवनातील साध्या अनुभवांना असामान्य साहित्यिक अभिव्यक्ती देत मराठी ललित साहित्य समृद्ध केले. डोह, मनातल्या उन्हात, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा यांसारख्या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी वाचकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला.

‘मौज’ या प्रतिष्ठित नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी अनेक नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेला नवे आयाम दिले. साहित्यावरील त्यांची निष्ठा, संवेदनशीलता आणि साधेपणा भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील, असेही त्यांनी नमूद केले.

श्री.वि. कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत