मुंबई: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान मुळीच सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
वांद्रे येथील डॉ. बळीराम हिरे महाविद्यालय येथे १३२ हून अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मंत्री पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. सदर संस्थेत मान्यताप्राप्त वास्तुशास्त्र अभ्यासक्रमाच्या नावाखाली विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसलेला अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थेवर विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्याचे तसेच महाराष्ट्र राज्य कृषि, पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च, तंत्र व व्यवसाय शिक्षण यांमधील अनधिकृत संस्था व अनधिकृत अभ्यासक्रम (प्रतिबंध) अधिनियम २०१३ अंतर्गतही कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी मंत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना सावध राहण्याचे आवाहन केले. अनधिकृत संस्था किंवा विद्यापीठे खोटी आमिषे दाखवून प्रवेश देतात आणि नंतर विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे समोर येते. त्यामुळे कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित अभ्यासक्रमाची मान्यता उच्च शिक्षण संचालनालय, तंत्रशिक्षण संचालनालय किंवा सक्षम प्राधिकरणांच्या संकेतस्थळावर तपासून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी विभागाने विशेष कार्यप्रणाली (SOP) तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत Recognition of Prior Learning या तरतुदीनुसार फसवणूक झालेल्या १३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित अबाधित राहील यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (MahaSARC) यांनी अभ्यास करून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठ चे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.