मुंबई: विधानभवनातील हाणामारीच्या घटनेनंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला, ज्याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले. सुरुवातीला संयम बाळगून असलेले गोपीचंद पडळकर यांनी अखेर प्रसारमाध्यमांसमोर येत जितेंद्र आव्हाडांना थेट इशारा दिला आहे.
काय आहे प्रकरण
गुरुवारी, १७ जुलै रोजी, विधानभवनाच्या लॉबीमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आव्हाड यांनी मध्यरात्री पोलिसांच्या गाडीसमोर आडवे पडून आंदोलन केले. आज सकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत भाजप आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली.
आव्हाडांच्या टिकेनंतर पडळकरांनीही मौन सोडून आव्हाडांना प्रत्युत्तर दिले. “जितेंद्र आव्हाड यांना सांगावं की, मी शांत आहे याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. तुम्ही काही धुतल्या तांदळाचे नाहीत, मला तुमच्या सगळ्यांबद्दल सर्व काही माहिती आहे,” अशा शब्दांत पडळकरांनी आव्हाडांना सुनावले.
पडळकर पुढे म्हणाले, “सकाळपासून आव्हाडांचं जे नाटक सुरू आहे, त्यावर मी सविस्तर बोलेन. मला न बोलण्याच्या सूचना मिळाल्या आहेत, त्यामुळे मी शांत आहे. पण मी यावर सविस्तर भूमिका मांडेन. तोपर्यंत आव्हाडांनी माझ्या मौनाचा चुकीचा अर्थ काढू नये.” पत्रकारानी ही धमकी आहे का विचारल्यावर, पडळकर म्हणाले, “यात कसली आली आहे धमकी? आता आपले मुद्दे सविस्तर मांडायचे देखील नाहीत का? कोणी चुकीचं बोललं असेल, तर त्याला उत्तर दिलेच पाहिजे.”
या घटनेनंतर पडळकर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त केली होती. “मी अध्यक्षांना विनंती केली होती की, आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली. त्यांना सक्त ताकीद देऊन जी काय कारवाई करायची ती करा, असे मी सांगितले,” असे पडळकर म्हणाले.
या प्रकरणातील एफआयआर (FIR) रात्री उशिरा दाखल झाला असून, कायदा सर्वश्रेष्ठ आहे असे पडळकर यांनी नमूद केले. “विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे सर्वोच्च असतात. त्यांच्या भूमिकेवर आमचं कुठलंही मत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाल्याचे मान्य करत, “आम्ही त्या निर्णयाचा आदर करतो. आम्ही याविरोधात न्यायालयात लढाई देऊ,” असेही गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.