राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी; गिरीश महाजन

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पंचायती राज संस्थांना सक्षम करून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत दिशादर्शक समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव श्री एकनाथ डवले, यशदाचे महासंचालक श्री चोक्कलिंगम, संचालक पंचायत राज आनंद भंडारी यांच्यासह समीतीचे सदस्य उपस्थित होते.

मंत्री महाजन यांनी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाचा यावेळी सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण भागात पंचायती राज व्यवस्था विकसित आणि मजबूत करण्यासाठी ही एक अनोखी योजना आहे. गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व शासकीय कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण आवश्यक आहे. मात्र त्यांनी या प्रशिक्षणांना पूर्णवेळ उपस्थित राहावे अशा सूचना मंत्री महोदयांनी दिल्या.

पंचायत लर्निंग सेन्टर साठी आदर्श ग्रामपंचायतींना देण्यात येत असलेल्या निधीत वाढ करण्यात येईल. शाश्वत विकास ध्येयांच्या नऊ संकल्पना प्रत्येक ग्रामपंचायतीने राबवाव्यात व यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियोजन करावे असे निर्देश दिले. स्थानिक प्रशासन संस्थांची क्षमता स्थानिक विकासाच्या गरजांप्रती अधिक उत्तरदायी होण्यासाठी, तंत्रज्ञानाचा लाभ घेत सहभागी योजना तयार कराव्यात. स्थानिक समस्यांवर शाश्वत उपाय शोधण्यासाठी उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षमतेने वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील ग्रामीण भागातील शाळेंच्या इमारतीच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटी करुन विद्यार्थ्यांना शाळेत आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी CSR (व्यवसाईक सामाजिक जबाबदारीच्या) माध्यमातून करण्यासाठी काही करता येवू शकेल काय, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शाळेत शौचालय बांधून ते स्वच्छ करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी ही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.