पालघर: वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाडा तालुक्यातील प्रदूषणाच्या मुद्द्यावर कडक भूमिका घेत प्रदूषण करणाऱ्या टायर कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. डाकिवली व कोनसई येथील ग्रामस्थांनी जनता दरबारात तक्रार केल्यानंतर नाईक यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला संबंधित कारखान्यांची तातडीने पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांना टाळे ठोकण्याचे निर्देश दिले.
वाडा तालुक्यात सुमारे 74 टायर पायरोलोसिस कंपन्या कार्यरत असून त्यापैकी 54 कंपन्या नियमांचे उल्लंघन करून दिवस-रात्र प्रदूषणकारी धूर सोडत असल्याचे उघड झाले आहे. जुने टायर जाळून त्यातून ऑइल व तारा काढण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वायू व जलप्रदूषण होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. कारखान्यांतील सांडपाणी नाल्यात सोडले जात असल्याने मासे व जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच सुरक्षेच्या अभावामुळे बॉयलर स्फोटात कामगारांच्या मृत्यूच्या घटनाही घडल्या असल्याचे सांगितले जात आहे.
उसर, दिनकर पाडा, वडवली, बिलोशी, पालसई, सापना, किरवली, नेहरोली, तोरणे, कोने, कोनसई व डाकिवली या गावांच्या हद्दीत हे कारखाने उभारले गेले आहेत. अनेक कंपन्यांकडे फॅक्टरी लायसन्स नाही, वनविभागाची परवानगी नाही, नगररचना विभागाची बांधकाम सनद नाही. केवळ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ना हरकत दाखल्यावर हे कारखाने सुरू असल्याचा आरोप आहे.
यापूर्वीही जनता दरबारात तक्रारी आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने 54 कारखान्यांना बंदची नोटीस बजावली होती. मात्र काही कारखानदार रात्री व सुट्टीच्या दिवशी कारखाने सुरू ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे.
डाकिवली येथील तक्रारदार उमेश पाटील यांनी सांगितले की, ‘अनंत दृष्टी प्रोसेसिंग एलएलपी’ या कंपनीला बंदची नोटीस असतानाही ती रात्री सुरू असते. वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने कुटुंबाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. पालकमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले असले तरी अंमलबजावणी न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर आता प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकी कोणती आणि कितपत कारवाई करते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.