मुंबईतील पावसाळी दुर्घटनांवर सरकारला धारेवर; जबाबदारांवर कारवाईची विजय वडेट्टीवार यांची मागणी

महाराष्ट्र

मुंबई: मुंबईसह राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याबद्दल काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत तीव्र चिंता व्यक्त केली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या दुर्घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मुंबईत मॅनहोलमध्ये पडणे, झाड कोसळणे तसेच मानखुर्द येथील इमारत दुर्घटनेत गेल्या दोन दिवसांत १२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे प्रशासनाची पूर्वतयारी आणि आपत्ती व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण, झाडांची छाटणी, मॅनहोलची सुरक्षितता, जलनिस्सारण व्यवस्था आणि आपत्कालीन नियोजन प्रभावीपणे झाले असते, तर अनेकांचे प्राण वाचले असते, असे त्यांनी नमूद केले.

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने द्रुतगती मार्ग, जुना मुंबई–पुणे महामार्ग आणि घाट विभागातील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून हजारो प्रवासी अडकून पडल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही या प्रकल्पात खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित झाला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

राज्य सरकारने संपूर्ण परिस्थितीबाबत तातडीने अधिकृत निवेदन करून नागरिकांना वस्तुस्थिती, उपाययोजना आणि पुढील नियोजनाची माहिती द्यावी. तसेच सर्व दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व यंत्रणांची जबाबदारी निश्चित करत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत