कोणालाच सहजासहजी न मिळणारी कागदपत्रे अंजली दमानिया यांना कशी मिळतात….

महाराष्ट्र

महाकुंभ हा देशातील तमाम हिंदूच्या आस्थेचा व श्रध्देचा विषय त्यामुळे त्यावर बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगावे…

मुंबई: अंजली दमानिया यांना जी सहजासहजी उपलब्ध होत नाहीत अशी गुप्त कागदपत्रे कशी काय मिळतात आणि ती खरी आहेत की खोटी आहेत याची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

इफ्को कडून खरेदी करण्यात आलेली नॅनो युरिया, अॅटोमॅटीक स्प्रे पंप खरेदी असेल याबाबत आरोप करण्यात आले मात्र त्याचा खुलासा तत्कालीन कृषीमंत्री आणि विद्यमान अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आला आहे. मंगळवारी सुध्दा धनंजय मुंडे यांच्यावर खोटी कागदपत्रे सादर केली आणि मान्यता घेतली असा सनसनाटी आरोप अंजली दमानिया यांनी केला त्याचादेखील खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे.

मंत्रीमंडळ बैठकीचा अजेंडा लीक झाला म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ज्या कागदपत्रांवर मुख्य सचिवांची, कृषी सचिवांची सही आहे, टिपणी आहे. अशा प्रकारच्या कागदपत्रांचा सोर्स आणि त्याची खात्री याचा शोध लागला पाहिजे. लोकशाहीत आरोप करण्याचा अधिकार आहे परंतु काहीतरी सनसनाटी आरोप जबाबदार मंत्री खोटी कागदपत्रे, खोटी टिपणी तयार करुन २०० कोटीच्या व्यवहाराला मान्यता देतो अशाप्रकारचा जो धादांत खोटा आरोप केला आहे त्या आरोपाचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून खंडन करण्यात येत आहे असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

आमचा न्यायालयावर विश्वास असून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आजच (बुधवारी) मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहेत.१९९५ मधील ती केस असून तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी काही कागदपत्रांमध्ये माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू यांनी फेरफार केली अशी तक्रार होती. ३० वर्षानंतर हा अनपेक्षित निकाल आला आहे. आमचा न्यायालयावर विश्वास असून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आजच (बुधवारी) मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध अपील दाखल करणार आहेत. त्यामुळे खालच्या कोर्टाने दिलेल्या निकालाविरुध्द स्थगिती मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचे कारणच नाही असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

जेव्हा एखादे बंदर विकसित होते किंवा विमानतळ होते त्यावेळी नक्कीच त्या विभागाचा विकास हा खूप जलदगतीने होतो आणि पालघर जिल्हयात भारतातील सर्वात मोठे बंदर वाढवण येथे होत आहे त्यावेळी तिथे आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता आणि तशाप्रकारची पावले राज्य सरकारकडून उचलली जात असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचे स्वागत करते असेही आनंद परांजपे म्हणाले.

महाकुंभ हा देशातील तमाम हिंदूच्या आस्थेचा व श्रध्देचा विषय त्यामुळे त्यावर बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगावे…

१४४ वर्षाने होणारे महाकुंभ हे देशातील तमाम हिंदूच्या आस्थेचा विषय आहे आणि त्यामुळे त्यावर बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. ट्वीट करताना कुठल्याही धर्माच्या धार्मिक भावना आपल्या ट्वीटमुळे दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. महाकुंभ मेळा हा हिंदूचा आस्थेचा… श्रध्देचा विषय आहे असेही आनंद परांजपे यांनी ठणकावून सांगितले.