जे शहर ब्रिटिशांना शरण गेले नाही ते या कमळाला कसं शरण जाईल

महाराष्ट्र राजकीय

सांगली: ब्रिटीशांना शरण न जाणाऱ्या स्व. वसंतदादा यांचे हे शहर आहे. जे शहर ब्रिटिशांना शरण गेले नाही ते या कमळाला कसं शरण जाईल ? हा विचार ध्यानी असू द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांना केले.

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक १,२,९,१० मध्ये मतदारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्या आघाडीला लोकांचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जयंतराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, शहराचे अनेक प्रश्न पूर्वी अनुत्तरित होते. कुपवाडला पाण्याची व्यवस्था नव्हती. भुयारी गटार नव्हते. इथे सत्तांतर झाले, आघाडीचे सरकार आले त्यानंतर विकास कामांचा प्रारंभ झाला. कुपवाड मध्ये १४ पाण्याच्या टाक्या उभारल्या. भुयारी गटार निर्माण केले. मात्र गेल्या आठ वर्षात झालेली विकास कामे देखील यांना सुव्यवस्थेत ठेवता आली नाही. आज शहरात नशेचे प्रमाण वाढले आहे. नवीन वर्ष सुरू होताच दोन खून झाले. शहरात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. मागील काळात या परिसरातील चैत्रबन नाल्यासाठी मी पालकमंत्री असताना १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु तो नाला स्वच्छ करण्याचे काम देखील यांना करता आले नाही. भाजपच्या काळात या तिन्ही प्रभागात कोणतेही ठोस काम झाले नाही असे त्यांनी सांगितले.

मी पालकमंत्री असताना जिल्हा पोलीस अधीक्षकांचे नवे कार्यालय पूर्ण झाले आहे. शहरात भव्यदिव्य असा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा आपले उमेदवार मनगु आबा सरगर यांच्या माध्यमातून उभा राहिला. भारतीय जनता पक्षाने काय दिले असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राज्याची आणि देशाची लोकशाही धोक्यात आली आहे

या राज्याची आणि देशाची लोकशाही धोक्यात आली आहे असे म्हंटले तर वावगं ठरणार नाही अशी टीका जयंतराव पाटील यांनी आपल्या भाषणात केली. सुमारे ७० नगरसेवकांचे निकाल बिनविरोध लागले. बिनविरोध होताना उमेदवारांना कोणाची दहशत होती का, भीती होती की काही देवाणघेवाण झाली अशी शंका सर्वसामान्यांना येत आहे असे ते म्हणाले. वाम मार्गाने सत्तेत पोहचण्याचा प्रयत्न भाजपा आणि मित्र पक्ष करत असतील तर मतदारांनी जागरूक राहिले पाहिजे असे आवाहन करत असतानात त्यांनी निष्ठेचा नवा अर्थ निसटा असा घेऊन अनेक जण पक्ष बदलत आहेत अशी टीका पक्ष बदलणाऱ्यांवर केली.