भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी? मिलिंद नार्वेकरांचा सवाल; नक्की काय चाललंय?”

महाराष्ट्र

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतून (BMC) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची तब्बल २५ वर्षांची सत्ता खेचून आणल्यानंतर आता भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुंबईत सत्ता मिळाल्यानंतरही भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या चर्चांना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार Milind Narvekar यांच्या एका ट्वीटमुळे अधिक उधाण आले आहे. नवनिर्वाचित महापौरांच्या संदर्भात नार्वेकरांनी सूचक ट्विट करत “नक्की काय चाललंय?” असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे.

नार्वेकरांनी आपल्या ट्विटमध्ये महापौरांविरोधात प्रसिद्ध झालेल्या दोन बातम्यांची कात्रणे शेअर केली आहेत. त्यात महापौरांच्या कारवरील लाल आणि निळ्या दिव्यांच्या वापरावरून निर्माण झालेल्या वादाचा उल्लेख आहे. या प्रकरणावरून स्वतःच्याच पक्षातील काही गट महापौरांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

महापौरांच्या अधिकारांबाबत किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवरून भाजपमध्येच दोन गट पडले आहेत का, अशी शंका या ट्विटमुळे अधिक गडद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील भाजपच्या अंतर्गत राजकारणाची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनाई आदेशानंतरही महापौरांनी अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत प्रशासनाला पत्र लिहिल्याची माहिती समोर आली होती. त्या घटनेनंतरही भाजपमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

मुंबई महापालिकेत सत्ता गेल्यानंतर ठाकरे गट भाजपमधील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे मानले जात आहे. नार्वेकरांच्या ट्विटमुळे एकीकडे महापौरांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा आणि दुसरीकडे भाजपमधील विसंवाद अधोरेखित करण्याचा दुहेरी राजकीय डाव साधल्याची चर्चा रंगत आहे.