पालघर : दापचरी येथे तब्बल १,३९५ एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक कृषी बाजारपेठ उभारण्यात येणार असून, या प्रकल्पातून सुमारे १० हजार रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. फ्रान्समधील रुंगीस मार्केटच्या धर्तीवर उभारण्यात येणारा हा प्रकल्प महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दापचरी येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी उत्पन्न बाजार प्रकल्पाच्या जागेची मंत्री जयकुमार रावल यांनी पाहणी केली. यावेळी पालघरचे अपर जिल्हाधिकारी सुभाष भागडे, मुंबईचे अपर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
रावल यांनी संपूर्ण १,३९५ एकर जागेची पाहणी करून प्रकल्पाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. गोशाळा परिसर, गोहर धाड कृषी विभाग आणि नवा मोहरा कृषी विभाग आदी भागांचीही त्यांनी पाहणी केली.
शेतमालासाठी अत्याधुनिक सुविधा
या बाजारपेठेत फळे, भाजीपाला, फुले, धान्य, मासे, दुग्धजन्य पदार्थ, मांस आदी विविध कृषी उत्पादनांसाठी बाजारपेठ, प्रक्रिया केंद्रे, पॅकिंग, साठवणूक, कोल्ड स्टोरेज आणि निर्यात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह देशभरातून शेतमाल या बाजारात आणला जाणार आहे.
वाढवण बंदर, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि भविष्यातील विमानतळ यामुळे दापचरी परिसराला इंटिग्रेटेड मल्टी-मोडल कृषी लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे रावल यांनी स्पष्ट केले.
स्थानिकांना रोजगाराला प्राधान्य
या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा स्थानिक नागरिकांना होणार असून, सुमारे १० हजार रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देण्यात येणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योग, गोदामे, कोल्ड स्टोरेज, लॉजिस्टिक्स, पॅकिंग, वाहतूक आणि पूरक सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल.
सध्या स्थानिक शेतकरी आणि मच्छीमारांना आपला माल विक्रीसाठी मुंबई किंवा वाशी येथे न्यावा लागतो. मात्र दापचरी येथे बाजारपेठ उभारल्यानंतर परिसरातच जागतिक दर्जाची बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने वाहतूक खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यास मदत होईल, असा विश्वास रावल यांनी व्यक्त केला.
विस्थापन होणार नाही
या प्रकल्पासाठी कोणाचेही विस्थापन केले जाणार नसल्याचे पणन मंत्र्यांनी स्पष्ट केले. अनेक वर्षांपासून पडून असलेल्या सरकारी जमिनीचा नियोजित विकास करून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पालघरला कृषी व्यापाराचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक बाजारपेठेशी जोडणी
वाढवण डीपवॉटर पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू बंदर, समृद्धी महामार्ग, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि वडोदरा एक्सप्रेस वे यांसारख्या पायाभूत सुविधांशी प्रकल्पाची जोडणी होणार आहे. त्यामुळे कृषी मालाची निर्यात अधिक सुलभ होऊन लॉजिस्टिक खर्चात बचत होण्याची अपेक्षा आहे. फळे, भाजीपाला, फुले, धान्य, कडधान्ये, मसाले आणि प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीला या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळणार आहे.