हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

महाराष्ट्र

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी भाजप आणि मुंबई महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

१४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने अनुयायी ‘राजगृह’ येथे दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून राजगृहासमोरील पदपथावर फिरती शौचालये उभारण्यात आली होती. त्या दिवशी स्थानिक नागरिकांनी याबाबत कोणतीही तक्रार केली नव्हती. मात्र, जयंतीला १० दिवस उलटूनही ही शौचालये अद्याप त्याच अवस्थेत असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींकडेही महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप गाडगीळ यांनी केला आहे.

यासोबतच ‘राजगृह’ परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दाही त्यांनी पुन्हा उपस्थित केला. काही वर्षांपूर्वी विधानपरिषदेत स्वतः गाडगीळ यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने तत्कालीन राज्यमंत्री रणजित पाटील यांनी ‘राजगृहाभोवतालच्या अर्धा किलोमीटर परिसरात सर्व प्रकारच्या अतिक्रमणाला बंदी’ असल्याचे जाहीर केले होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

तथापि, सध्याच्या घडीला ‘राजगृह’ परिसर टॅक्सी, फेरीवाले आणि शाळांच्या अनधिकृत वाहनांनी वेढलेला आहे. या संदर्भात गाडगीळ तसेच स्थानिक नागरिकांनी ‘एफ’ विभागाच्या उपआयुक्तांकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा हा आदर आहे का, असा थेट आणि परखड सवाल अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.