मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ मुंबईतील दादर येथे काँग्रेसने तीव्र आंदोलन केले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात निवडणूक आयोग आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
‘जब जब सरकार डरती है, पुलिस को आगे करती है’, ‘लोकशाही नाही हुकुमशाही आहे’, ‘निवडणूक आयोग भाजपाची शाखा आहे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत, “मिनाक्षी नटराजन यांच्या उमेदवारी अर्जाला कोणतेही कायदेशीर अडथळे नसताना तो रद्द करण्यात आला. हा निर्णय लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांवर आघात करणारा आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे,” असे म्हटले.
आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्यासह ब्रिज दत्त, राणी अग्रवाल, जोजो थॉमस, प्रकाश सोनावणे, श्रीरंग बरगे, विश्वजित हाप्पे, मनीष गणोरे, झीशान अहमद, राजा ठाकूर, श्रुती म्हात्रे, डॉ. मनीष पाटील, राहुल पिंगळे, नवीन सिंग आणि शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेसने या प्रकरणाविरोधात देशभरात लोकशाहीच्या संरक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.