शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक कारवाई सुरू केली आहे.
एका दिवसातच पोलीस पथकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८ वाहनांवर कारवाई करून ३७ हजार रुपये दंड वसूल केले आहेत. या कारवाईमुळे शहरात वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती निर्माण झाली असून नियमभंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईत पीएस आय नखाते, पोलीस हवालदार वाघमोडे, महिला पोलीस हवालदार जाधव आणि पोलीस अंमलदार सचिन गोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस पथक अधिक सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत असून, वाहतूक शिस्त, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यासाठी आणखी कठोर मोहिमा राबवल्या जाणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.