जरांगे पाटलांच्या विधानानं घातपाताचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; मुंडेंवर थेट हत्येचा कट रचल्याचा आरोप

महाराष्ट्र

बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ताज्या विधानामुळे घातपाताचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. काही महिन्यांपूर्वी जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. यातील अमोल खुणे या आरोपीला नुकताच जामीन मंजूर झाल्यानंतर त्याने जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत थेट नार्को टेस्टची मागणी केली आहे.

या मागणीला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरच माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. “मुंडेंनी माझ्या घातपाताचा कट रचला आहे”, असा गंभीर दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, आरोप-प्रत्यारोपांची ही मालिका इथेच थांबलेली नाही. बीड जिल्ह्यातील एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये स्वतःला ‘कराड समर्थक’ म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने मनोज जरांगे पाटील यांना थेट गोळ्या घालून मारण्याची धमकी दिल्याचा दावा समोर आला आहे. या ऑडिओ क्लिपमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

विशेष म्हणजे याआधी जरांगे पाटील यांनी दिलेलं नार्को टेस्टचं आव्हान मंत्री धनंजय मुंडे यांनीही स्वीकारलं होतं. त्यानंतर काही काळ दोघांमधील वाद निवळल्याचं चित्र होतं. मात्र, अमोल खुणेला हत्येच्या कटप्रकरणातून जामीन मंजूर झाल्यानंतर हा संघर्ष पुन्हा एकदा टोकाला पोहोचताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटामागे नेमकं कोण आहे? जरांगेंच्या आरोपांना धनंजय मुंडे प्रतिआव्हान देणार का? तसेच बीडमधील हा वाढता राजकीय संघर्ष आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवर काय परिणाम करणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.